रूपेश उत्तरवार यवतमाळयवतमाळ जिल्हा विपूल वनसंपदेने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्राचीन मंदिरांच्या वैभवाने भर घातली आहे. यासोबत काही तलावांनी सौंदर्य खुलविले आहे. या स्थळांना जोडणारे रस्ते असले तरी पर्यटन विकासासाठी जिल्ह्यात कोणतेही धोरण राबविले गेले नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळी पर्यटक फिरकतच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या स्थळांच्या विकासासाठी जिल्ह्याला २०० कोटींची आवश्यकता आहे. मात्र केवळ सव्वा कोटी मिळाले. यातून पर्यटन स्थळांचा आवश्यक तो विकास होत नसल्याचेच दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात ‘अ’ वर्गातील एकही पर्यटनस्थळ नाही. मात्र ‘ब’ वर्गातील दोन पर्यटन स्थळ आहेत. या स्थळांच्या विकासाचा आराखडा राज्यशासनाने मंजूर केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने निधी येत आहे. यामध्ये बेंबळा प्रकल्प आणि कळंब तालुक्यातील दत्तापूरचा समावेश आहे. दोन वन पर्यटन स्थळजिल्ह्यात विपूल वन संपदा आहे. त्यामुळे उमरखेडमधील पैनगंगा अभयारण्य आणि केळापूरातील टिपेश्वर अभयारण्याचा यामध्ये समावेश आहे. या अभयारण्यात जंगली प्राणी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्र्र्यटकांची संख्या मोठी आहे. परंतु पर्यटकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील पर्यटनाचा विकास हवा तसा झाला नाही.या अभयारण्यात पोहोचण्यासाठी पुरेशा टुरीझम बसेस नाही. पुरेसे निवारे आणि जंगल भ्रमणाची व्यवस्था नाही. यामुळे या ठिकाणचे पर्यटन दुर्लक्षित झाले आहे.यवतमाळ तालुक्यातील ढुमणापूर, वसंतस्मृती उद्यान ही दोन स्थळं ‘क’ वर्गात आली आहेत. या स्थळांच्या विकासाकरिता अनेक बाबींची गरज आहे. पर्यटन ट्रेन, मोठे झुले आणि अभयारण्य, संग्रहालये या महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी अद्यापही नाहीत.उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा यातीलच एक आहे. या पर्यटनस्थळाच्या विकासाला मोठा स्कोप आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र त्यांच्या निवाऱ्यासह छोट्या मुलांची खेळणी आणि इतर बाबी या ठिकाणी अद्यापही लागल्या नाहीत. चांगले हॉटेल्ससुद्धा उपलब्ध नाही. सोबतच विद्युत निर्मितीतही हे स्थळ शासनाला महसूल देऊ शकतात. मात्र त्याचा विचार झाला नाही.यवतमाळ तालुक्यातील जामवाडी तलाव कंत्राटी पद्धतीने पर्यटनाच्या हेतूने चालविण्यासाठी दिले. काही दिवस हे चालले. काही खासगी संस्थेने ते दत्तक घेतले होते. नंतर त्यांचा करार संपल्यावर पुन्हा नव्याने कुणी इकडे फिरकले नाही. यातून हे स्थळ पर्यटनापासून कोसो दूर गेले आहे. निळोना जलाशयाच्या सांडव्यावर पर्यटन विकसित करण्याचे काम करण्यात आले. त्यादृष्टीने काही दुरूस्त्या झाल्या. मात्र हे काम आज अर्ध्यावर आहे. निवाऱ्यासह बसण्याचे थांबे आणि हिरवळ या ठिकाणी अद्यापही फुलली नाही. उमर्डा नरसरी पर्यटनस्थळाच्या यादीत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना जंगली प्राण्यांची माहिती देणारे एक माहिती संग्रालय स्थापन होणार आहे. हे काम अद्यापही पूर्ण व्हायचे आहे. पूर्ण नर्सरीतील विविध जंगली प्राणी आणि वृक्षांची ओळख करण्यासाठी या ठिकाणी जाणारे वाहने उपलब्ध नाही. या ठिकाणावरून वाहतूक होते. मात्र बसेस थांबत नाही. यातून हे पर्यटनस्थळ दुर्लक्षित झाले आहे.मनदेव देवस्थान हे प्राचीन देवस्थान आहे. जलाशयासोबत विपूल वनसंपदा आहे. या वनसंपदेच्या रक्षणासोबत या ठिकाणचे पर्यटन विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र हे काम संंथगतीने सुरू आहे. हिवरीजवळील जेतवन पॅलेस विहार विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गौतम बुध्दाच्या विशाल मूर्तीसह ध्यान करण्यासाठी विस्तीर्ण जागा आहे. सुंदर हिरवळ फुलवली आहे. मात्र विकासाची अनेक कामे अद्यापही बाकी आहेत. मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी, नवरगाव, कोसाऱ्याचा जोंजाई धबधबा अद्यापही दुर्लक्षित आहे. अनेकांना हा धबधबा माहीत नाही. दारव्हा तालुक्यातील गोकी या धरणावर पाण्याचा ओव्हर फ्लो होण्याच्या ठिकाणी सौंदर्य फुलविण्यात आले. आता या सुंदर ठिकाणाकडे दुर्लक्ष झाले आहे. नेर तालुक्यातील पाथ्रट गोळे, सिरसगाव, चिंतामणी, खोड्या बरड टेकडी, शिरजगाव पांढरी, या ठिकाणाच्या विकासाकरिता निधीची गरज आहे. मात्र पुरेसा निधी मिळाला नाही. पुसद तालुक्यातील धुंदी हे ठिकाणसुद्धा ऐतिहातिक ठिकाण आहे. या ठिकाणावरून मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या ठिकाणी महात्मा गांधी आले होते. हे ठिकाण घनदाट अरण्यात आहे.उमरखेडमधील मुळगव्हाण, तपोवन, कवडशी, अंबोना तलाव अशी दुर्लक्षित ठिकाणे आहेत. दारव्हा तालुक्यातील रंगो बापुजींचे समाधीस्थळ असेच दुर्लक्षित झाले आहे. कुंभारकिन्ही धरणाची अवस्थाही अशीच आहे. अशी अनेक ठिकाणे अडगळीत पडली आहेत.
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी हवे २०० कोटी
By admin | Updated: September 27, 2014 01:06 IST