भुरकीवासीयांची व्यथा : पक्का रस्ता कधी होणार?, ग्रामस्थांचा संतप्त सवालनांदेपेरा : भुरकी-नांदेपेरा (पोहणा) या दोन्ही गावाचे अंतर जेमतेम ५ किलोमीटर आहे. मात्र अद्याप पक्का रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना नांदेपेरा गाठण्यासाठी २० किलोमीटरचा फेरा पडत आहे.भुरकी हे गाव पोहणा गावाशी जुळून आहे. भुरकी-पोहणा ही गट ग्रामपंचायत आहे. भुरकी येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तेथील विद्यार्थ्यांना चौथीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी नांदेपेरा येथे यावे लागते. भुरकी ते नांदेपेरा या गावाचे अंतर जेमतेम ५ किलोमीटरचे आहे. मात्र अद्यापही पक्का रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना चिखलात पाय तुडवीत शिक्षण घेण्यासाठी नोदेपेरा येथे यावे लागते. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण घेण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते.भुरकी-पोहणा गट ग्रामपंचायत असून तेथील सरपंच हा पोहणा गावातील आहे. त्यामुळे भुरकीच्या विद्यार्थी, ग्रामस्थांना दाखला घेण्यासाठीसुद्धा भुरकीवरून पोहणा येथे जावे लागते. भुरकी या गावाचे स्वस्त धान्य दुकानसुद्धा पोहणा येथेच आहे. त्यामुळे दर महिन्याला शिधापत्रिकाधारकांना धान्य घेण्यासाठी पोहणा येथे पायपीट करावी लागते. ग्रामपंचायत कार्यालय मात्र भुरकी येथे असल्याने पोहणा येथील पदाधिकारी व ग्रामस्थांना भुरकी येथे जावे लागते. त्या दोन्ही गावाचा संबंध प्रत्यक्षपणे असताना स्वातंत्र्यानंतरही या दोन्ही गावाला जोडणारा रस्ता मात्र तयार झालाच नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभेचे उमेदवार या गावाला रस्ता करून देण्याचे अश्वासन देतात. मात्र निवडणूक आटोपली की कुणीच ढुंकूनही बघत नाही. त्यामुळे अजूनही या दोन गावांना जोडणारा पक्का रस्ता निर्माण झाला नाही. पक्का रस्ता नसल्याने या गावातील ग्रामस्थांना २० किलोमीटरचा फेरा पडत आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने नेट पोहचले, मात्र रस्ता नाही, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. आता उन्हाळा संपला मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गाववासीयांची व विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली नाही. (वार्ताहर)विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती शासन कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलांना मोफत हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे, याकरिता विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रूपये खर्च करते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना रस्त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते, अशा गावांचे काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहे. या रस्त्याबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा ठराव घेऊन आजी-माजी, आमदार, खासदारांपर्यंत समस्या पोहोचविली. तथापि अद्याप रस्ता मिळाला नाही. भुरकी या गावाचा थेट संपर्क नांदेपेरा पोहणा या गावाशी आहे. स्वस्त भाव दुकान, बँक, शाळेशी प्रत्येकांचा संबंध येतो. त्यामुळे हा पाच किलोमीटरचा रस्ता भविष्यात तरी होईल की नाही, याबाबत ग्रामवासी साशंक आहे. आता येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मानसिकतेत तेथील ग्रामस्थ दिसून येत आहे.या रस्त्याबाबत अनेक ठराव शासन, लोकप्रतिनिधींकडे दिले. पावसाळ्यात या रस्त्याने चिखल राहात असल्याने भुरकी गावाला वणीवरून २० किलोमीटरचे अंतर गाठून जावे लागते. भुरकी येथे ग्रामपंचायत कार्यालय असून ग्रामसभा घेताना पोहणा येथील ग्रामस्थांची उपस्थिती राहात नाही. रस्ता नसल्यामुळे कर्मचारीही या गावाकडे दुर्लक्ष करतात.- ललिता पेचेसरपंच, भुरकी (पोहणा)
२० किलोमीटरचा पडतो फेरा
By admin | Updated: June 8, 2015 00:10 IST