नियोजनशून्यतेवर आक्षेप : दोषींवर कारवाई करण्याची मागणीयवतमाळ : दलित वस्ती सुधार योजनेतून कामे करण्यासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रत्यक्षात या योजनेतून अद्याप छदामही खर्च झाला नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी आणि या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दलित वस्तीसाठी सुधारणा कराव्या, अशी मागणी नाग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दलित वस्ती सुधार योजनेतून २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावर कामकाजाचा निर्णय न झाल्याने हा निधी अद्यापही अखर्चित राहिला आहे. दलित वस्तींमध्ये ग्रंथालय निर्माण करणे, स्पर्धा परीक्षेसाठी अद्ययावत कक्ष तयार करणे, अभ्यासिका उभारणे, व्यायामशाळा, सभागृह, खेळाचे मैदान विकसित करणे, बगीचा विकसित करणे, अनुसूचित जातीच्या लोकांसाठी व्यापारी संकुल उभारणे, यांसह विविध बाबींसाठी निधी खर्च करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे सादर करण्यात आला. निवेदन देतेवेळी नॅशनल आंबेडकरराईट गार्ड असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड, सतीश मेश्राम, विलास मेश्राम, देवेंद्र जनबंधू, बाबाराव चिंचवडकर, दमयंती बहादुरे, बिरोबाई रायलीवाले, अनुप सवाई, विशाल पावडे, स्वप्नील नाठार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)
दलित वस्ती योजनेचे २० कोटी अडकले
By admin | Updated: February 5, 2016 01:52 IST