यवतमाळ : शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी ३०२ गावांमध्ये २५०३ कामे पूर्ण झाली असून पूर्ण कामातून दीड लाख हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ४१३ गावांमध्ये सदर अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषी विभागासह जलसंपदा, वने, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद सिंचन, लघुसिंचन, भूजल सर्वेक्षण, पाणी पुरवठा या विविध विभागाने अभियानातून कामे हाती घेतली आहे. विविध प्रकारची उपचाराची २७ कामे केली जात असून ४१३ गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे. जुलैअखेर ३०२ गावांमध्ये २५०३ कामे पूर्ण झाली आहे. पावसामुळे कामांना मर्यादा आली असली तरी पावसात सुरु राहू शकत असणारी कामे केली जात असून अशी १८७ कामे सुरु आहेत. अभियानात घेण्यात आलेल्या गावांमध्ये जुने ९१६ सिमेंटनाला बांध व २७ मातीनाला बांध आहे. यापैकी १०४ नालाबांधाची दुरुस्ती करण्यात आली असून ३३४ बांधाचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले. तसेच २४ मातीनाला बांधाची दुरुस्ती झाली. त्यामुळे या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाला आहे. पहिल्या टप्प्यात अभियानांतर्गत निवडलेल्या सर्व ४१३ गावांमध्ये जलसिंचनाची कामे घेऊन ही गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासोबतच गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावात शेततळे, ढाळीचे बांध, विहीर पुनर्भरणाची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात अशा १५ लाखांच्या कामांचा समावेश आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा अभियानाचा उद्देश आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्तमधून दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन
By admin | Updated: August 10, 2015 02:06 IST