यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र या पावसाने अद्यापही आॅगस्टची सरासरी गाठलेली नाही. परिणामी जलप्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. यामुळे रबीसह उन्हाळ्यातील पेयजलाचा प्रश्न भविष्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळी पावसाने १२०० घरांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यामध्ये ७३ हजार रुपये सानुग्रह मदत वितरित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेचा सामना दोन् ावेळा करावा लागला. अशा स्थितीत पीक हातातून जाणार असल्याचा धोका निर्माण झाला होता. ४ ते ६ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पाऊस बरसला. आतापर्यंत ३९९ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के आहे. मागिल वर्षी १ आॅगस्टपर्यंत ४९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये १०० मिमीची तफावत आहे. यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प पूर्णत: भरले नाहीत. प्रकल्पांना ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी दोन मोठ्या पावसांची आवश्यकता आहे. यानंतर रबी आणि उन्हाळी पिकांचे नियोजन करता येईल. उन्हाळ्यात मुबलक पाण्यासाठी प्रकल्पांमध्ये जलसाठा असणे गरजेचे राहणार आहे. हवामान खात्याने आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल्पपावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे प्रकल्प भरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास उन्हाळ्यात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर वार्ताहर)
१२०० घरांची पडझड, ७३ हजार मदत
By admin | Updated: August 8, 2015 02:35 IST