यवतमाळ : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांची भूजल पातळी घटल्याचे पुढे आले आहे. एक मीटरने पाणी पातळी घटली असून आगामी काळात पाणी टंचाईची स्थिती आणखी गडद होण्याचे संकेत आहेत. यावर उपाय म्हणून विंधन विहिरींचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. भुजल सर्वेक्षण विभागच्यावतीने वर्षभरात जानेवारी, मार्च, मे आणि आॅक्टोबर, महिन्यात भूजल पातळीचा आढावा घेतला जातो. यामध्ये पाण्याची पातळीही मोजली जाते. त्यानुसार पाणीटंचाईचे नियोजन करण्यात येते. १७९ विहिरींच्या निरीक्षणावरून १६ तालुक्यातील भूजल पातळीचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालातील सर्वचबाबी धक्कादायक आहे. अपुऱ्या पावसाने भूजलात मोठी घसरण झाल्याचे पुढे आले आहे. सर्वाधिक घट उमरखेड तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या तालुक्यात भुजल पातळी ०.८३ मीटरने घटली आहे. यवतमाळ तालुक्याची भूजल पातळी ०.६४ मीटरने घटली आहे. आर्णीची भूजल पातळी ०.४६ मीटरने घटली आहे. दारव्हाची भूजल पातळी ०.३७ मीटरने घटली आहे. राळेगावची पातळी ०.६२ मीटरने तर महागावची पातळी ०.३८ मीटरने घसरली आहे. झरी तालुक्याच्या भूजल पातळीत ०.२१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यासोबतच घाटंजी, मारेगाव, पुसद आणि वणी तालुक्याची भूजल पातळी स्थिर आहे.विहीर अधिग्रहणासाठी सर्वेक्षणभूजल पातळी घसरल्याने मे महिन्यात चित्र विदारक होण्याची स्थिती आहे. तत्पूर्वी उपाय म्हणून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. कळंब, राळेगाव, पांढरकवडा, पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. (शहर वार्ताहर)
११ तालुक्यांची भूजल पातळी घसरली
By admin | Updated: February 13, 2015 01:52 IST