विधानसभा : ७४ उमेदवारांची माघार, चौरंगी लढती यवतमाळ : सातही विधानसभा मतदारसंघातील चित्र ७४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बहुतांश मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. आमदाराच्या सात जागांसाठी आता १०३ उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन मागे घेण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. सात मतदार संघातून तब्बल ७४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यात सर्वाधिक १८ यवतमाळातून, उमरखेड १७, पुसद १५, दिग्रस १०, राळेगाव ८, आर्णी ४ तर वणीतून दोन उमेदवारांनी मैदान सोडले. त्यात यवतमाळातून बाबासाहेब गाडे पाटील, राजाभाऊ ठाकरे, राजेंद्र पाटील या कुणबी उमेदवारांसह उमरखेडचे हरिश पाचकोरे, राळेगावातून सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश सोने, आर्णीतून उध्दव येरमे आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. वणी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत पहायला मिळणार आहे. येथे प्रमुख चार पक्षांसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर रिंगणात आहेत. गत दोन निवडणुकांप्रमाणे यावेळीही ते प्रस्थापित उमेदवारांपुढे तगडे आव्हान उभे करू शकतात. त्यातच मनसे नेते राज ठाकरे यांची जाहीर सभा झाल्याने उंबरकरांना आणखी बळ मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वामनराव कासावार हे सहाव्यांदा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीचे संजय देरकर, शिवसेनेचे विश्वास नांदेकर, भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुलवार यांचे आव्हान आहे. देरकर, नांदेकरांमुळे कुणबी मतांचे विभाजन होणार आहे. बोदकुलवार पाटण परिसरातील असल्याने त्यांचा कासावारांच्या मतांमध्ये मोठा वाटा राहणार आहे. कुणबी मतांच्या विभाजनावर कासावारांचे गणित नेहमीच अवलंबून राहिले आहे. मात्र यावेळी स्वबळावरील निवडणुकीमुळे कासावारांना आपल्या बालेकिल्ल्यातील भाजपा उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वसंत पुरके यांच्या विरोधात भाजपाचे अशोक उईके, शिवसेनेचे उमेदवार तथा पोलीस जमादार उत्तम मडावी, राष्ट्रवादीचे मिलिंद धुर्वे यांचे आव्हान आहे. या तिघांपैकी पुरकेंना कोण फाईट देतो याकडे लक्ष लागले आहे. दादा गट काँग्रेसमध्ये आल्याने पुरके प्लस दिसत असले तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे त्यांच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. यावेळी या मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते प्रवीण देशमुख यांची खरी ताकद पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत ही ताकद आघाडीमुळे काँग्रेसच्या मागे दडपली जात होती. मात्र यावेळी देशमुखांना स्वत:सह पक्षाचे वजन दाखविण्याची जणू सुवर्णसंधी चालून आली आहे. पुरकेंच्या विरोधात सर्वसंमतीने एकच उमेदवार देण्याची व्यूहरचना निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. मात्र ज्यांनी या व्यूहरचनेसाठी पुढाकार घेतला तेच पुरकेंच्या बाजूला जाऊन बसल्याने ही योजनाच चौपट झाली. हीच स्थिती शिवसेना व भाजपाची आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सात जागांसाठी १०३ उमेदवार
By admin | Updated: October 1, 2014 23:28 IST