सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24 - सध्या वाशिमसह जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तुलनेने दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. शहरांतर्गत सुसाट वेगाने धावणारी ही वाहने मन मानेल त्या पद्धतीने पुढे जाण्याच्या शर्यतीत मुख्य रस्त्यावरून ‘रिस्की टर्न’ घेत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत असून गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
वाशिम शहरात हिंगोली नाका, पुसद नाका, पोष्टआॅफीस चौक, अकोला नाका, पाटणी चौक, शिवाजी चौक, आदी मुख्य ठिकाण असून दुचाकी, चारचाकी वाहनांची नित्यनेम वर्दळ असते. त्यातच जडवाहतूकही बिनबोभाट सुरू असल्याने समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. यादरम्यान दुचाकी वाहनधारक पुढे जाण्याच्या उद्देशाने मुख्य रस्त्यावरून वळताना ‘रिस्की टर्न’ घेत आहेत. हा प्रकार वेळप्रसंगी जीवावर बेतत असून वाहतूक विभागाने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.