संपूर्ण विश्व कोरोना महामारीमुळे संकटात सापडले असून, जगातील मानवी जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्था मागील दोन वर्षांत खिळखिळी झाली आहे. या महामारीतून बाहेर पडण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाला मदत करण्यासाठी अनेक सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक संस्था समोर येऊन समाजाप्रती आपली जबाबदारी निभावत आहेत. समता फाऊंडेशनसुद्धा मानवी कल्याणासाठी आपले योगदान देऊन ईश्वरीय कार्य करीत आहे. आपल्या जन्मभूमी व मातृभूमीचे ऋण कोणालाही फेडणे शक्य नाही. परंतु अग्रवाल बंधू आपल्या कार्यातून मातृभूमीची सेवा करून किंचित ऋणमुक्त होण्याचा करीत असलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे. त्यांच्या कार्याला रिसोड शहरवासीयांनी स्वतः लस घेऊन इतरांनाही लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. हे पुण्यकार्य करून लोक कल्याण साधावे. ब्रह्माकुमारीज ही विश्वव्यापी संस्था असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कटिबद्धता सिद्ध करीत आहे.
लसीकरण ही मानवी कल्याणाची मोहीम : ब्रह्माकुमारी ज्योती दीदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST