वाशिम : गत १३ दिवसांपासून एकमेकांवर आग ओकणार्या उमेदवारांच्या प्रचारतोफा आदर्श आचारसंहितेमुळे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळ ५ वाजतानंतर थंडावणार आहेत. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास बाकी असताना उमेदवारांना प्रचार थांबवावा लागत असतो. यामुळे गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावणार आहेत. उमेदवारांच्या हातात आता अवघे ३६ तास उरले आहेत. आमदार होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी स्वत:ला झोकून दिले आहे. जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यात ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांची सं ख्या आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण २८७७६९, वाशिम मतदार संघात ३२२९३४ तर कारंजा मतदार संघात २८६0२२ अशी मतदार संख्या आहे. विधानसभा निवडणूकीच्या या आखाड्यात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष आदी पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. तिनही मतदारसंघात निकराच्या झुंजी आहेत. गत १३ दिवसां पासून प्रचारसभा, कॉर्नर सभा, ध्वनीक्षेप, प्रचार रॅली आदींच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रमुख पक्षांच्या स्टार प्रचारकांनी जाहिर सभांद्वारे राजकीय वा तावरण अधिक तापविण्याचे काम केले आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजता ही प्रचार करण्याची अंतिम मुदत उमेदवारांना राहणार आहे. ५ वाजतानंतर आचारसंहितेचा भंग होणार नाही, या दृष्टिकोनातून निवडणुक आयोगाच्या अधिकारी-कर्मचार्यांची प्रत्येक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या हालचालीवर करडी नजर राहणार आहे.
आज प्रचारतोफा थंडावणार !
By admin | Updated: October 13, 2014 02:03 IST