गावातील एका व्यक्तीचा अकोला येथे तर दोन व्यक्तीच्या वाशीम येथे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावातील नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सांगण्यात येत आहे. परंतु सदर चाचणी करण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्यामुळे गावात आजार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २५ एप्रिल रोजी पळसखेड गावात कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. परंतु या लसीकरण शिबिराला गावातील नागरिक पुढे येत नसल्याचा प्रकार दिसून आला. लसीमुळे विविध प्रकारचे गैरसमज गावकऱ्यांमध्ये असल्यामुळे व त्यांना समज नसल्यामुळे गावकरी लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याची माहिती मिळत आहे. परंतु नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे, असे आवाहन रिसोड पंचायत समिती सभापती सुभाष खरात यांनी ग्रामस्थांना केले आहे.
कोरोनामुळे पळसखेड गावात तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST