वाशिम: कृषी निविदा परवान्यासाठी कृषी पदवीधर नियुक्ती आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारी रोजी कृषी विक्रेत्यांनी भारत बंदचे आयोजन केले आहे. या बंदमध्ये जिल्हय़ातील दुकानदारांनी सहभागी होऊन बंद यशस्वी केल्याचे जिल्हा फर्टीलाझर्स, पेस्टीसाईडस, सिडस डिलर्स असोसिएशनच्यावतीने कळविण्यात आले आहे.केंद्र सरकारने रासायनिक खते, बी- बियाणे व कीटकनाशके विक्री परवान्याकरिता कृषी पदवी सक्ती कायदा अमलात आणला आहे. हा कायदा कृषी निविदा विक्रेत्यांसाठी जाचक आहे. त्यामुळे देश पातळीवर ९ फेब्रुवारी रोजी बंद पुकारण्यात आला होता. जिल्हय़ातील कृषी दुकानदारांनी यामध्ये सहभागी होऊन बंदला प्रतिसाद दिला, असे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, सचिव नितीन पाटणी यांनी कळविले. मालेगाव : शहरातील सर्व कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी संघटनेच्या वतीने ९ फेब्रुवारी २0१६ रोजी बंद पाळला असून, तहसीलदार यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने कृषी विक्रेत्यांना शैक्षणिक पदवी पात्रतेची केलेली सक्ती गैर आहे. या जाचक अटीमुळे राज्यातील हजारो विक्रेते पदवीप्राप्त नसल्यामुळे त्यांना व्यवसाय बंद करावा लागेल. या अटीमुळे व्यवसाय बंद करावा लागल्यामुळे बेरोजगारी वाढेल, अशी मागणी कृषी सेवा संचालकांनी केली आहे. कीटकनाशकाची विक्री केवळ कृषी पदवी बी.एस्सी, अँग्री, बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी असलेल्या पात्रताधारकाला करता येणार असल्याची अधिसूचना केंद्राने ५ ऑक्टोबर २0१५ रोजी जारी केली आहे. या जाचक अटीमुळे आम्हाला ग्राहकांना सेवा देता येणार नाही. या कायद्याला आमचा विरोध नसून या अटींसंदर्भात शासनाने परत एकदा विचार करावा, याकरिता आधी सूचना रद्द करण्याबाबत ९ फेब्रुवारी रोजी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला व भारत बंदला पाठिंबा देत आहोत, अशा प्रकारचे निवेदन संघटनेच्यावतीने तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, राधेश्याम बिरला, ओमप्रकाश गट्टाणी, वनसकर, भास्कर अनसिंगकर, बाबूराव सदार, संजय मोरे, वाझुळकर, पाटील, नंदू गायकवाड, बाहेती, मंत्री, अग्रवाल, कैलास भांडेकर, मालेगाव, शिरपूर, मेडशी, जऊळका, येथील कृषी सेवाकेंद्राचे संचालक उपस्थित होते.
वाशिम जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद यशस्वी
By admin | Updated: February 10, 2016 02:12 IST