दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती येते की नाही अशी शंकाच निर्माण झाली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव या सर्व आपत्तींनी शेतकऱ्यांना यंदाही बेजार केले आहे. मूग, उडीद, कपाशी सर्वच पिकांना या आपत्तींचा फटका बसला. त्यात सप्टेंबरच्या मध्यंतरापर्यंत नैसर्गिक आपत्तींचा सामना करून सावरलेले सोयाबीन पीक आता परतीच्या पावसाने पिच्छा पुरविल्याने संकटात सापडले आहे. सततच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटून झाडावरच सोयाबीनची रोपे दिसू लागली आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकावर हा प्रकार होत असल्याने शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडला आहे.
०००००००००००००००००००
कापणीची अन् वाळविण्याचीही संधी नाही
बहुतांश ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगा सुकण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी पिकाची कापणी करण्याच्या तयारीत होते; परंतु गेल्या चार, पाच दिवसांपासून पाऊस उसंतच घेत नसल्याने हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीची अन् वाळविण्याचीही संधीही मिळू शकली नाही.
००००००००००००००००
गुरांच्या चाऱ्यासाठीही उपयोग नाही
सततच्या पावसामुळे अनेक भागातील साेयाबीन पिकाची स्थिती एवढी वाईट झाली आहे की, या पिकाची कापणी करून त्यापासून थोडेथोडके पैसे मिळण्याची शक्यता दूरच, गुरांना चारा म्हणूनही हे पीक उपयोगी पडण्याची शक्यता उरली नाही.
०००००००००००००००००००००
शेतकरी म्हणतात, मायबाप शासन मदत देईल का ?
१) कोट : गेल्या चार, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचा सत्यानाश केला. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नच गंभीर झाला. उत्पन्नाची कोणती आस नाही. आता मायबाप शासन या नुकसानापोटी मदत देईल का?
- प्रीतम भगत,
शेतकरी,
०००००००००००००००
२) कोट : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक होत्याचे नव्हतेच केले. या पिकावर संपूर्ण खर्चाची आणि कुटुुंबांची मदार होती. आता उत्पन्नाची कोणती आशा नाही. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी.
- डिगांबर उपाध्ये,
शेतकरी,
००००००००००००००००००
शासनाकडे अहवाल पाठवू
कोट: सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे नियमानुसार होतील, तसेच या पिकाच्या शेंगांना फुटलेल्या अंकुराची स्थिती पाहता, सहकाऱ्यांना पाहणीच्या सूचना देऊन शासनाकडे अहवाल पाठवून मदतीचा विचार करण्याचीही मागणी करू.
-शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वाशिम