कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत
वाशिम : हिंगोली मार्गावर निर्माणाधीन उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दर दिवशी पाहायला मिळत आहे. एखाद्वेळी या ठिकाणी अपघात घडण्याची भीती आहे.
नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा
वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. परंतु अद्याप पंचनामे केल्याचे दिसून येत नाही.
शेतकऱ्यांना कलम बांधणीचे मार्गदर्शन
वाशिम : कलम बांधणी व फळबागेबद्दल कृषिकन्या अर्पिता हरिहर वाहुरवाघ हिने विझोरा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वाहुरवाघ ही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कर्मयोगी बाबाराव जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनी आहे.