पुढील आठवड्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन गृहविभागाने नियमावली तयार केली आहे. शिवजयंती गड-किल्ल्यांवर साजरी न करता, ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवाच्या वेळी १०पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. या कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृहविभागाने म्हटले आहे. प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना अंतर नियमांचे पालन करावे, अशा मार्गदर्शक सूचना दिल्या असून, यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी शिवजयंती, या वर्षी मात्र साधेपणाने साजरी होणार असल्याने शिवभक्तांत नाराजीचे वातावरण आहे.
शिवजयंती निर्णयाबाबत शिवभक्तांत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST