अमोल कल्याणकर मालेगाव (जि. वाशिम), दि. ५: जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी गावातील विविध पक्षांच्या गटांमध्ये मोठी राजकीय खेळी सुरू झाली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती निवडणुकीला गावोगावी राजकीय रंग चढत असल्याचे दिसून येत आहे.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद गावपातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते, तेव्हा-तेव्हा चक्क पोलीस बंदोबस्तात मतदान घ्यावे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीला वेगळे वलय मिळाल्याने तद्वतच राजकीय हस्तक्षेप वाढल्याने त्याचा विपरित परिणाम शाळांमधील शिक्षणावर होत आहे. गावात अध्यक्षपदाचा मान आणि शालेय व्यवस्थापन समितीला मिळालेल्या आर्थिक अधिकारांमुळे यात मोठय़ा प्रमाणात राजकीय पक्षांची घुसखोरी झाली आहे. प्रत्येक गावात विविध राजकीय पक्षांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गट असतात, आपल्याच गटाला, पक्षातील पालक शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष व्हावा, यासाठी अनेकदा मोठी चुरस निर्माण होते. पालकसभेत कुणाच्याही नावावर एकमत होत नसल्याने शेवटी गुप्त मतदान होऊन पालक प्रत्येक वर्गातून सदस्यांची निवड करतात. यासाठी एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच तयारी केली जाते.आपल्याच पक्षातील अथवा गटातील पालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडावी, यासाठी डावपेचही खेळले जात आहेत. यामुळे शिक्षण देणारी शाळा जणू राजकीय आखाडा होत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
शालेय व्यवस्थापन समिती निवडणुकीला राजकीय रंग!
By admin | Updated: September 6, 2016 01:55 IST