वाशिम : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा यासह पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गतवर्षी पहिले ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. पाचवी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू होत्या. यंदादेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मुले घरातच असल्याने मोबाईल व टीव्हीचे व्यसन जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागला आहे.आत्मविश्वास नसणे, नैराश्य, एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.
००००००००००००००००
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली - १९६९०
दुसरी - २०१९८
तिसरी - १९६९८
चौथी - २११७७
पाचवी -२१०५२
सहावी - २११३६
सातवी -२१४३६
आठवी २१५९४
नववी २१९३६
दहावी २३५७९
००००००००००००००
मुलांच्या समस्या...
शाळा बंद असल्याने मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्यस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाईल, संगणक, टॅबच्या आहारी गेल्याने याचा विपरीत परिणाम त्यांच्या एकाग्रतेवरही होत आहे.