रिसोड (जि. वाशिम): व्यापारी कल्पेश वर्मा आत्महत्याप्रकरणी आठवडाभरापासून फरार असलेले रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानाहून १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत. जागेच्या वादावरून कल्पेश वर्मा यांनी ७ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. कल्पेशला भूखंडाच्या व्यवहाराचा प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. या कारणामुळे कल्पेशला नैराश्य आले. यामधून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. जीवनयात्रा संपविण्याच्या अगोदर कल्पेशने ह्यसुसाईड नोटह्णमध्ये नगरसेवक पती अशोक अग्रवाल व इतर लोकांचा त्रास असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. मध्यंतरीच्या काळात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी वर्मा यांना व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. या घटनेची रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गोविंद वर्मा यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीमध्ये न.प. मुख्याधिकारी पानझाडे, सुनील बगडिया, नगरसेविका मीना अग्रवाल, अशोक अग्रवाल यांच्याविरुद्ध कलम ३0६, ३४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून उपरोक्त सर्व आरोपी पसार झाले होते. मोबाइल ह्यलोकेशनह्णमुळे पानझाडे अमरावती येथील निवासस्थानी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पानझाडे यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार शेख रउफ, पोलीस उपनिरीक्षक रवी हुंडेकर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन पांचाळ, भागवत कष्टे यांनी कामगिरी बजावली.
रिसोड न.प. मुख्याधिकारी पानझाडे यांना अटक
By admin | Updated: April 15, 2016 02:09 IST