वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत अद्याप ५० टक्केही जलसाठा झाला नाही, केवळ ४९ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सिंचनासह पाणीटंचाईची समस्या काही भागांत उद्भवण्याची भिती आहे.
वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला नाही, परंतु मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले होते. जून महिन्यात पावसाची अपेक्षित अशी नोंद झाली नाही, तर जुलै महिन्यात पावसाने दीर्घकाळ खंड दिला. त्यामुळे पेरण्या उलटण्याची आणि कोरडा दुष्काळाची भीतीही वाटू लागली होती. तथापि, जुलैच्या मध्यंतरापासून आणि ऑगस्ट महिन्यातही पूर्वार्धात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना आधार झाला. आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने धडाका लावल्याने पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. तथापि, पावसाळा संपण्यास आता अवघे २३ दिवस उरले असतानाच जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.
०००००००००००००
तिन्ही मध्यम प्रकल्प ओव्हर
जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ७६ टक्के जलसाठा झाला आहे, तर जिल्ह्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प काठोकाठ भरले आहेत. मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के साठा झाल्याने मालेगाव तालुक्यातील सोनल आणि वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत.
०००००००००००००
वाशिम तालुक्यात पाऊस व जलसाठा सर्वात कमी
जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांत सरासरी ७८ टक्के जलसाठा झाला असला तरी वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी असल्याने या तालुक्यातील ३६ प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत केवळ ४५ टक्केही जलसाठा झाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येण्याची शक्यता आहे.
०००००००००००००
गत २४ तासांत ४७.७० मि.मी. पाऊस
जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण सरासरी ९७ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता होतीच. त्यात ६ सप्टेंबरच्या सकाळपासून ते ७ सप्टेंबर सकाळपर्यंतच्या २५ तासांत जिल्ह्यात ४७.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी १०३ टक्क्यांवर पोहोचली.
००००००००००००००००००
-जिल्ह्यातील एकूण प्रकल्प - १३७
-एकूण जलसाठा - ७७.८७ टक्के
- मध्यम प्रकल्पातील जलसाठा - १००
- लघू प्रकल्पातील जलसाठा - ६५.४३
००००००००००००००००००००००००००००००००
० ते ५० टक्क्यांपर्यंत साठा असलेले तालुकानिहाय प्रकल्प
तालुका - प्रकल्प
वाशिम - २२
मालेगाव - ०१
कारंजा - ०२
मंगरुळपीर - ०१
रिसोड - ०७
मानोरा - ०१
--------------------