जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आणि जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुल देशमुख यांनी युतीची घोषणा केली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीला स्थगिती मिळाल्याने राजकीय घडामोडीदेखील स्थिरावल्या. दरम्यान, स्थगिती उठविण्यात आल्याने निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, जनविकास व वंचित आघाडीची युती कायम असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख व जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुल देशमुख, गजाननराव लाटे यांनी २१ सप्टेंबर रोजी जाहीर केले. या आढावा बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा झाली असून, निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे अद्याप काही निश्चित नसून, चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. महाविकास आघाडी होणार की नाही, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
जनविकास, वंचित आघाडीच्या युतीची पुनर्घोषणा; महाविकास आघाडी अधांतरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST