कार्ली (जि. वाशिम): १४ ऑगस्टपासून कार्ली येथील सिंगल फेज रोहित्र जळाल्याने विद्युत पुरवठा बंद झाला. नागरिकांना केवळ पाच तास वीज मिळत आहे. किन्हीराजा ३३ केव्ही, कार्ली येथील २५ केव्ही सिंगलफेजचे तिनही ट्रान्सफार्मर १४ ऑगस्टला नादुरुस्त झाले. याबाबतची जाणीव पत्रव्यवहारावर संबंधीत स्थानिक लाईनमनने व ग्रामस्थांनी उपकेंद्रावरील अधिकार्यांना दिली. त्याबाबतच्या पाठपुरावाही केला आहे. मात्र आज महिना लोटला तरी याबाबत संबंधीत विभाग व त्यांचे अधिकारी सकारात्मक ठोस पावले उचलतांना दिसत नाहीत. तीन हजार लोकसंख्या असलेल्या कार्ली गावात तीन पिठाच्या गिरण्या, दोन नळ योजना व इतरही छोटे मोठे लघुउद्योग या विद्युत पुरवठयाच्या भरवशावर चालतात. मात्र केवळ ५ तास थ्रि फेज पुरवठा करण्याचा व रात्रीला विद्युत पुरवठा न सोडण्याच्या तुघलकी कारभाराने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. याकडे वीज वितरणच्या जबाबदार अधिकार्यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांनी गुरूवारी केली. ग्रामपंचायतने घेतला ठराव! सिंगल फेजच्या विद्युत पुरवठा बंद असल्याचा मुद्दा ग्रामपंचायतच्या मासिक सभेत गाजला. गावात दोन महिन्यांपासून लाईनमन नाही. पूर्वीचे लाईनमन एन.एस. गोंडाळ आपले कर्तव्य चोख बजावत होते. त्यामुळे त्यांना परत कार्ली येथे रुजू करुन घ्यावे. लोकसंख्येचा विचार करता अतिरिक्त रोहीत्र द्यावे, असा ठराव ग्रा.पं. कार्ली यांनी बुधवारी घेतला असून, सकारात्मक तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांसमवेत ग्रा.पं.ही रस्त्यावर उतरेल, असा इशाराही दिला.
सिंगलफेजचा वीज पुरवठा बंद
By admin | Updated: September 18, 2015 00:19 IST