वाशिम : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने २४ सप्टेंबर रोजी विधाता प्रशिक्षण केंद्र येथे एकदिवसीय ‘निर्यात संमेलन’ पार पडले. निर्यातदार, निर्यात क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निर्यात क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय वृद्धिंगत करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. डी. खंबायत, अमरावती येथील रुबन ॲग्रो एक्स्पोर्ट कंपनीचे अमीन खान, ऋषिवट फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे एस. के. देशमुख, उद्योग निरीक्षक के.ए. शेख, उद्योजक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खंबायत यांनी यावेळी ‘निर्यात संमेलन’ आयोजनामागील हेतू विषद केला. ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील संधींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून उत्पादने निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानगी, नियम, अटी याविषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे, तसेच आगामी काळातसुद्धा जिल्ह्यातील उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्याच्या निर्यातविषयक कृती आराखड्याच्या अनुषंगाने त्यांनी यावेळी माहिती दिली.