वाशिम : कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांनी जिल्हाभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. मध्यंतरीच्या काळात या संकटाची व्याप्ती झपाट्याने वाढल्याने प्रत्येकजण हैराण होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून स्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख शून्याकडे घसरत असून २२ सप्टेंबरला उपचार घेत असलेल्या तिघांना डिस्चार्ज देण्यात आला; तर आता केवळ दोघांवर उपचार सुरू आहेत. यावरून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या पहिल्या लाटेत बाधितांचा एकूण आकडा ७ हजार ४३० वर पोहोचला. या कालावधीत १५८ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता तुलनेने अधिक राहिली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत बाधितांचा एकूण आकडा आजमितीस ४१ हजार ७४० वर पोहोचला आहे; तर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आकड्याने ६३८ चा पल्ला गाठला आहे.
असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटाचे ढग झपाट्याने हटत असल्याची समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन बाधित आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आलेखही खालावला असून एकही नवा रुग्ण निष्पन्न होत नसल्याचे दिवसही वाढलेले आहेत. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार यापूर्वी उपचार घेत असलेल्या ५ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी तिघांना डिस्चार्ज देण्यात आला; तर नव्याने एकही रुग्ण निष्पन्न झाला नाही. त्यामुळे सध्या केवळ दोन व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यांच्यातही विशेष लक्षणे नसल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यक्तीही लवकरच डिस्चार्ज होऊन घरी परतणार असल्याची माहिती आहे.
.........................
कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांचा लेखाजोखा
पहिल्या लाटेत आढळलेले बाधित - ७४३०
पहिल्या लाटेत झालेले मृत्यू - १५८
दुसऱ्या लाटेत आढळलेले बाधित - ३४३१०
दुसऱ्या लाटेत झालेले मृत्यू - ४८०
.................
कोरोना संसर्गाची सद्य:स्थिती
दोन्ही लाटांमध्ये एकूण पॉझिटिव्ह – ४१७४०
दोन्ही लाटांमध्ये एकूण डिस्चार्ज – ४१०९९
आतापर्यंत झालेले कोरोनाने मृत्यू - ६३८
सध्या ‘ॲक्टिव्ह’ असलेले रुग्ण – २
...............
कोट :
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या संकटाची व्याप्ती पूर्णत: कमी झालेली आहे. दैनंदिन केल्या जाणाऱ्या चाचण्यांमधून अहवाल ‘निगेटिव्ह’ येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आजमितीस केवळ दोन रुग्ण उपचाराखाली असून त्यांच्यातही विशेष लक्षणे नसल्याने त्यांना लवकरच ‘डिस्चार्ज’ देण्यात येईल. संकट निवळले आहे; पण संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे सुरूच ठेवावे.
- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम