मागील आठवड्यापर्यंत रिसोड आगाराच्या जवळपास १५ ते १६ फेऱ्या रिसोड-अकोला-रिसोड या मार्गावर होत होत्या. शिरपूर येथून सकाळी साडेसहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत १५ ते १६, रिसोडसह जिंतूर व अकोला आगाराच्या बसफेऱ्या रिसोड-अकोला मार्गावर होत होत्या. फेब्रुवारी २०२० नंतर कोरोना संसर्गजन्य आजाराने एस.टी.ची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. काही महिन्यांनंतर कोविड नियमांचे पालन करीत हळूहळू एस.टी.ची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती. जुलै २०२० ते मार्च २०२१ पर्यंत एस.टी.ची प्रवासी वाहतूक पूर्ववत झाली होती. मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग आजाराने राज्यात पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात दररोज पन्नास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण निष्पन्न होत आहेत. हे लक्षात घेता मागील काही दिवसांपासून कोरोनासंदर्भात प्रवासी वाहतुकीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर दिसून आला.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची चाके तर बरेच दिवसांपासून पुरती थांबली. अगोदरच डिझेल दरवाढीने त्रस्त असलेल्या खासगी वाहतूकदारांना घटलेल्या प्रवासी संख्येमुळे वाहने उभी करण्याखेरीज पर्याय नव्हता. याचप्रमाणे घटत्या प्रवासी संख्येमुळे एस.टी.च्या फेऱ्यासुद्धा कमी झाल्याचे चित्र रिसोड अकोला मार्गावर पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपर्यंत रिसोडसह जिंतूर व अकोला आगार मिळून या मार्गावर १६ रिसोड अकोला बसफेऱ्या दिवसाकाठी पूर्ण होत होत्या. आता मात्र केवळ चार ते पाच फेऱ्या होत आहेत.