विवेक चांदुरकर / वाशिमजिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षात बंडखोरी झाली असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत पक्षांपुढे बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तसेच पक्षबदलही झाले आहेत. निवडणुकीत अनेक उमेदवार केवळ पैसे कमविण्यासाठीही अर्ज दाखल करतात. त्यामुळे यामध्ये पैशांचा घोडाबाजार मोठय़ा प्रमाणात चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांची उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी युती व आघाडी तुटल्यामुळे अनेकांना आ पल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. उमेदवारी मिळविण्याकरिता नेत्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. मात्र, ऐनवेळेवर दुसर्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे अनेक इच्छूकांना धक्का बसला व त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून पक्षाला हादरा देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकच पक्षात बंडखोरी झाली. जिल्ह्यात कारंजा म तदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश डहाके यांना डावलून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे डहाके यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसची उमेदवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांना मिळाली असून, माजी मंत्री तथा कारंजाचे माजी आमदार बाबासाहेब धाबेकर यांचा मुलगा सुनील धाबेकर यांनीही अपक्ष म्हणून कारंजातून उमेदवारी दाखल केली आहे. गतवेळी वाशिम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्या माजी जिल्हाध्यक्ष अल्का मकासरे यांनी यावेळी पक्षाने माजी आमदार सुरेश इंगळे यांना उमेदवारी दिल्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. तसेच जिल्ह्यात काही पक्षबदलही झाले. वाशिममध्ये भाजपाचे सरचिटणीस डॉ. दीपक ढोके यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ पली उमेदवारी दाखल केली. रिसोड विधानसभा मतदारसंघात मनसेतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून यामध्ये पती पत्नी विजयी झालेले विश्वनाथ सानप यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेतर्फे आपली उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी व्हावे, याकरिता सर्वच पक्ष आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बंडखोरांना शमवून त्यांना आपल्या बाजुने करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे. यामध्ये मतदारसंघात अनेक घडामोडी घडणार आहेत.
आता आव्हान बंडखोरी शमविण्याचे
By admin | Updated: September 29, 2014 02:26 IST