वाशिम : वाशिम कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, सत्तास्थापनेसाठी दोन्ही गटाकडून अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. ३0 सप्टेंबर रोजी सभापती-उपसभापती पदाची निवडणूक होत असून याकरिता दिग्गजांचे राजकीय कसब पणाला लागले आहे. गत दोन दिवसांपासून बाजार समितीचे काही संचालक अज्ञात स्थळी रवाना झाल्याने या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व निर्माण होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वाशिम कृषिउत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली. ७ सप्टेंबर रोजी लागलेल्या निकालात देशमुख-ठाकरे गटाला आठ, तर गोटे गटाला सात जागा मिळाल्या. तीन जागा हमाल-मापारी व व्यापारी-अडते मतदारसंघाकडे गेल्या. या निवडणुकीत एका बाजूने दिग्गज आणि दुसर्या बाजूने एकटे माजी सभापती नारायणराव गोटे असे चित्र निर्माण झाल्याने सुरुवातीला एकतर्फी भासणारी निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची झाली. निकालाअंती देशमुख-ठाकरे गट आठ जागांवर, तर गोटे गटाला सात जागा मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. हमाल व व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेल्या तीन संचालकांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्याने या तीन उमेदवारांना आपल्या तंबूत आणण्यासाठी दोन्ही गटाने फिल्डिंग लावली आहे. व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले रमेशचंद्र लाहोटी हे आमदार पाटणी यांचे खंदे सर्मथक म्हणून ओळखले जातात. पाटणी कोणत्या गटाला पसंती देतात, यावर लाहोटी यांचा निर्णय अवलंबून राहील, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहेत. आनंद चरखा व हिरा जन्नू जानीवाले यांनी अद्याप निर्णय जाहीर केला नसल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे; मात्र देशमुख-ठाकरे गटाचाच सभापती-उपसभापती होईल, असे त्यांच्या सर्मथकांमध्ये बोलले जात आहे. असे असले तरी नारायणराव गोटे काही चमत्कार घडवून आणू शकतात, असे राजकीय वतुर्ळात बोलले जात असल्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर ठाकरे-देशमुख गट लक्ष ठेवून आहे.
बाजार समितीचे संचालक अज्ञात स्थळी
By admin | Updated: September 30, 2015 01:31 IST