जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजवर ६,९८,२६४ डोस देण्यात आले. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ४३ टक्के आहे. जिल्हा परिषदेने हे प्रमाण वाढविण्यासाठी कोविड-१९ धडक लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ज्या गावांत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांत कार्यरत शिक्षण विभाग, कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट, एकात्मिक बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, महसूल विभाग व आरोग्य विभाग यामधील कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून जिल्हास्तरावरून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मोहिमेदरम्यान जि.प.अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या त्या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून अवगत करावे, जेणेकरून ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली जाईल, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
०००००००००००००
प्रभागनिहाय नीअर टू द होम लसीकरण सत्र
लसीकरण मोहिमेसाठी प्रा. आरोग्य केंद्र स्तरावरील २६ रुग्णवाहिका, ८ लसीकरण वाहनांच्या आधारे गावामध्ये प्रभागनिहाय पद्धतीने नीअर टू द होम पद्धतीने लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. या लसीकरण सत्राकरिता तालुकानिहाय पर्यवेक्षणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
०००००००००००००००
गावागावांत जनजागृती
लसीकरण मोहिमेचा वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून संबंधित गावांत दोन दिवस अगोदर दवंडी किंवा स्पीकरव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा अंगणवाडीसेविका, महिला बचत गट संयोजिका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग घेण्यात येणार आहे.
००००००००००००००
मोहिमेस सहकार्याचे आवाहन
लसीकरण मोहिमेत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, धर्मगुरू, प्रभावशाली व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश अहेर यांनी केले आहे.