जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर यापूर्वी ११ बॅरेज निर्माण केले आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील १० आणि रिसोड तालुक्यातील एका बॅरेजचा समावेश आहे. रिसोड तालुक्यातूनही पैनगंगा नदी जात असून, पैनगंगा नदीवर ६ बॅरेज उभारणीची मागणी आहे. या नदीवरील कळमगव्हाण प्रकल्प तांत्रिक कारणामुळे रद्द झाला आहे. कळमगव्हाण प्रकल्पासाठी मंजूर असलेले पाणी मसलापेन येथे उभारण्यात येणा-या नवीन बॅरेजसाठी वापरण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. त्यामुळे पैनगंगा नदीवरील एका बॅरेजचा प्रश्न मार्गी लागेल, उर्वरित ५ बॅरेजच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या चाचपणी करावी, अशा सूचना वाशिम जिल्हा दौ-यावर असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाल्या दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू असून, पैनगंगा नदीवर सहा बॅरेजची निर्मिती झाल्यास अधिकाधिक जमीन सिंचनाखाली येईल, असा आशावाद शेतकरी बाळगून आहेत.
तांत्रिक कारणामुळे कळमगव्हाण प्रकल्प रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST