^^^^^
मनरेगातून गावाची समृद्धी साधण्याबाबत मार्गदर्शन
वाशिम : मनरेगाच्या माध्यमातून गावाचा विकास साधून गाव कसे समृद्ध करता येईल, याबाबत राेहयो विभागाकडून गावागावांत कामगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचेही सहकार्य लाभणार असून, जाॅबकार्डधारक कामगारांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---
कांदा लागवड, व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
वाशिम: आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कांदा या पिकाचे योग्य वेळेत योग्य ते व्यावस्थापन व्हावे या उद्देशाने वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या मार्गदर्शनाखाली व कृषी विभागाकडून कांदा लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जात आहे.
--------------------
पीक कापणीत शेतकरी व्यस्त
वाशिम : सध्या सोयाबीन, उडीद, मूग ही खरीप पिके काढणीवर आली असताना जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने या पिकांची कापणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान दिसून आले.
--------------------
खंडाळा धरणावर वाढली झुडपे
वाशिम : तालुक्यातील खंडाळासह इतर काही धरणांच्या भिंतींवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मुळं खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन धरणावरील झुडपे छाटावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
--------------------