उंबर्डाबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत दुघोरा येथील ग्रामपंचायत प्रशासन तथा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी गावातून स्वच्छतारॅली काढून गावकर्यांना ग्रामसफाईचा संदेश देण्यात आला. दुघोरा ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेसंबंधीचे विविध उपक्रम राबविले जात असून या गावाची हगणदारीमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे. गावकर्यांनी शौचालय बांधण्याच्या कामासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने गावात शनिवारी स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांंनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. रॅलीतील विद्यार्थ्यांंच्या स्वच्छताविषयक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीचा समारोप जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी सरपंच मीराबाई पुंड, उपसरपंच दिलीप भगत, ग्रामपंचायत सदस्य अनिता बांडे, तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष सावके, पोलिस पाटील चाटे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक एस.सी. वंजारे यांनी केले. स्वच्छता रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक खंडारे, राऊत, रिठे, बोरगडे, चौधरी, डेरे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांंसह ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक एस.सी.वंजारे यांनी करुन आभार मानले.
स्वच्छता रॅलीद्वारे ग्रामसफाईचा संदेश!
By admin | Updated: February 16, 2016 00:47 IST