वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना मराठा, आदिवासी, दलित व बहुजन अशा सर्वच समाजातील मतदारांनी मते देऊन निवडून दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी देशभरात मोदी लाट आलेली होती; तिचा फायदा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर झाला. तसेच या मतदारसंघात भावना गवळी यांनी मागील पाच वर्षापासून सातत्याने ठेवलेला जनसंपर्क, त्या माध्यमातून विविध समाजातील जोडलेले कार्यकर्ते व लोक , कुणाच्याही विरोधात भूमिका न ठेवता केलेली विकास कामे या बाबी गवळीचे प्लसपाईंट ठरल्या. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवार कोण राहणार याबाबत शेवटच्या क्षणापर्यत राहिलेली अनिश्चितता, पक्षाकडून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघें यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आल्याने त्यांना संपुर्ण मतदारसंघात व्यक्तिश: जनसंपर्क साधण्यात वेळ कमी पडला. योग्य समन्वयाचा अभाव, जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन मतदारसंघात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर प्रचारसभा न होणे,आदी बाबींमुळे मतदारांमध्ये वेगळाच संदेश गेला. परिणामी, राकाँचा पुसद मतदारसंघाचा अपवाद वगळता यवतमाळ, राळेगाव या काँग्रेसकडे असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघाते काँग्रेसचे उमेदवार मोघे यांच्यापेक्षा सेनेच्या गवळींना २८ व २७ हजारांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कारंजा मतदारसंघात सुमारे ४ हजार मतांनी आघाडी मिळाली. परिणामी शिवसेनेच्या भावना गवळी यांचा लागोपाठ चवथ्यांदा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
सर्वच स्तरातून गवळींना पाठबळ
By admin | Updated: May 17, 2014 23:10 IST