रिसोड : शहरातील व तालुक्यातील निराधार, अनाथ व गोरगरीब यांच्यासाठी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ रिसोडच्या वतीने करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ १५ मेपासून करण्यात आला.
कोरोनाकाळात अनेकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. कडक निर्बंध लागू असल्यामुळे गोरगरीब, निराधार नागरिकांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न गोरगरीब नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. गोरगरीब, निराधार, अनाथांना भोजनदान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाने पुढाकार घेतला आहे. कोरोना रुग्ण तसेच नातेवाइकांना दररोज संध्याकाळी मोफत भोजन दिले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ १५ मे रोजी झाला. छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालण्यात आला. नायब तहसीलदार बनसोड, पोलीस उपनिरीक्षक विशाल मुंडे, नगरसेवक पवन चित्तरका व मित्र मंडळींची उपस्थिती होती. कैलास राजूरकर, विशाल जैन, सचिन जैन, सचिन बोराळकर, ऋषिकेश ठाकूर, पंकज पिंपळे, सोनू बगडे, गजानन शहाणे व अजय बगडिया, मयंक अग्रवाल, कार्तिक जमदाडे, सचिन गांजरे, प्रसाद गांजरे, शिवाजी पोधाडे आदींनी पुढाकार घेतला.