वाशिम : अमानी महामार्ग पोलिस मदत केंद्रावर रुजू होण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १८ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित करताच, पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी २२ ऑगस्ट रोजी सदर पोलिस कर्मचार्यांना कार्यमुक्त केल्याने या कर्मचार्यांचा अमानी केंद्रावर रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महामार्गावरील बेताल वाहतुकीला ताळय़ावर आणण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्हय़ात अमानी येथे महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. या केंद्रावर एक पोलिस उपनिरीक्षक, ३४ कर्मचारी व दोन चालक असा फौजफाटा देण्यात आला आहे. पोलिस कर्मचार्यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. डिसेंबर २0१२ मध्ये ३२ कर्मचार्यांचा तीन वर्षांंंचा सेवाकाळ संपुष्टात आल्याने मुंबई येथे डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात महामार्गाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळे यांच्या पॅनलने मुलाखत प्रक्रिया राबविली. मुलाखतीमधून अमानी येथे ३२ जणांची निवड करण्यात आली होती. नियुक्तीच्या पाच महिन्यानंतर नऊ कर्मचारी रुजू झाले होते. एक पोलिस उपनिरीक्षक, नऊ कर्मचारी आणि दोन चालक अशा १२ जणांच्या भरोशावर महामार्गावर ह्यवॉचह्ण ठेवण्याचे अवघड शिवधनुष्य या कर्मचार्यांना पेलावे लागत होते. कर्मचारी नसल्याने पातूर महामार्ग चौकीला कुलूप लागले आहे, तर अमानी केंद्र कसेबसे सुरू होते. कर्मचारी रुजू का होत नाहीत किंवा त्यांना पूर्वीच्या ठिकाणावरून कार्यमुक्त केले जात नाही, याबाबतचे गुलदस्त्यात असलेले ह्यवास्तवह्ण लोकमतने १८ ऑगस्ट रोजी वृत्ताद्वारे चव्हाट्यावर आणले होते. या वृत्ताची दखल घेत प्रभारी पोलिस अधीक्षक पाटील यांनी २३ कर्मचार्यांना वाशिम पोलिस दलातील सध्याच्या पोस्टिंगवरून कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे अमानी पोलिस मदत केंद्रावर कर्मचारी रुजू होत आहेत.
.. अखेर २३ पोलिस कर्मचारी रुजू
By admin | Updated: August 25, 2014 01:54 IST