वाशिम : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे जवळपास ६०० ते ७०० रुपयांनी वाढ केल्याने कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे बजेट कोलमडून जात आहे. जिल्ह्यासाठी ६० हजार मे.टन खतसाठा मंजूर झालेला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होत असते. खरीप व रब्बी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. सन २०१८-१९ पासून दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी शासन, प्रशासनाकडून उभारी देणे गरजेचे असतानाच, रासायनिक खताच्या किमतीमध्ये कंपन्यांनी भरमसाठ वाढ केली आहे. आगामी खरीप हंगामात वेगवेगळ्या रासायनिक ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक कंपन्यांनी खताच्या किमती वाढविल्याने बळीराजा हैराण झाला आहे. डीएपी १२०० रुपये प्रतिगोण मिळणारी आता १८०० ते १९०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी प्रत्येक गोणीमागे ६०० ते ७०० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत, तर दुसरीकडे १०:२६:२६ खताची ११७० रुपयांना मिळणारी गोणी आता जवळपास १७०० रुपयांवर पोहोचली आहे. १२:३२:१६ खताची ११८४ रुपयांना मिळणारी गोण आता जवळपास १७५० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.