सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.राज्याला दैनंदिन किमान १७ ते १८ हजार मेगावॉट विजेची आवश्यकता भासते. ही गरज भागविण्यासाठी महावितरणच्या वतीने कोयना विद्युत निर्मिती केंद्रावर सर्वाधिक वीजनिर्मितीचा भार दिला जातो. याशिवाय विदर्भातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर महावितरणची दारोमदार असते. या दोन ठिकाणाहून किमान १0 ते १२ हजार मेगावॉट वीज दर दिवसाला उपलब्ध होत असते. उर्वरित ५ ते ६ हजार मेगावॉट वीज ही खासगी वीजनिर्मिती केंद्राकडून घेतली जाते. मात्र, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असतानाही घटलेले पर्जन्यमान, दिवसेंदिवस अधिकच तापत असलेले ऊन आणि औष्णिक प्रकल्पांचे काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने विजेची मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात कमालीची तफावत निर्माण झालेली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने जी-१, जी-२, जी-३ ग्रुप या प्रकारात सात तासांचे आणि ‘एफ ग्रुप’मध्ये साधारणत: सव्वापाच तासांचे भारनियमन सुरू केले आहे. परिणामी, राज्यभरातील नागरिकांची तारांबळ उडत असून, लघू व्यवसाय संकटात सापडले आहेत.
नापिकीचे संकटही झाले गडद!अमरावती विभागातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्वच ४४३ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक असून, अधिकांश पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने खरिपातील पिके धोक्यात सापडली असताना ज्या शेतकर्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने यंदा नापिकीचे संकटही गडद झाले आहे.
वीजपुरवठा कमी आणि मागणीमध्ये अचानक झालेली वाढ लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना म्हणून राज्यभरात ई, एफ आणि जी या गटात विजेचे भारनियमन केले जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- पी.एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण