वाशिम : राज्यात आघाडी युतीत आलेली बिघाडी अन त्यानंतर इच्छूक उमेदवारांची अनपेक्षितपणे दाखल झालेली उमेदवारी यामुळे वाशिम जिल्हय़ातील तीनही विधानसभा मतदारसंघातील निवडणुका कुठे पंचरंगी तर कुठे बहुरंगी लढतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.जागा वाटपाच्या मुद्यावरुन भाजप शिवसेनेसह इतर घटक पक्षांच्या महायुतीचा घटस्थापनेला घटस्फोट झाला. त्याला काही क्षणाचा वेळ जातो की नाही तोच १५ वर्षापासून राज्यात आघाडी करुन सत्तेत राहणार्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतही बिघाडी आली. महायुती व आघाडीतील बिघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, या पक्षानी राज्यातील विधानसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवधीला केवळ ४८ तासाचा अवधी बाकी राहिला असताना घेण्यात आल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आजवर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंंत कायम संभ्रमावस्था राहिली. अर्थात या संभ्रमावस्थेच्या शेवटच्या क्षणापर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल करणार्या आजवरच्या सर्वच पक्षाकडील अनेक इच्छुक उमेदवारांनी अनपेक्षि तपणे ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती त्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐन वेळी दुसर्याच पक्षाकडून ए.बी. फॉर्मसह थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. आजघडीला निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता पक्षासाठी काम करणार्या अनेक कार्यक र्त्यांंना कोणता झेंडा घेवू हाती च्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली असली तरी रिसोड- मालेगाव, वाशिम-मंगरुळपीर व कारंजा-मानोरा या तीनही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी यासह इतर छोट्या मोठय़ा पक्षाच्या वतीने अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने होवू घातलेली विधानसभा निवडणूक जिल्हय़ाच्या राजकीय समिकरणांना कलाटणी देणारी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनपेक्षित दाखल झालेल्या उमेदवार्या, अनेक इच्छुकांचे ऐनवेळी उमेदवारी मिळण्याचे भंगलेले स्वप्न व सर्वच राजकीय पक्षांची एकला चलो रे ची हाक यामुळे वाशिम जिल्हय़ातील तीनही विधानसभा निवडणुका कुठे पंचरंगी तर कुठे बहुरंगी होण्याची शक्यता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांंमुळे वर्तविली जात आहे.
निवडणूका बहुरंगीच
By admin | Updated: September 28, 2014 00:05 IST