रिसोड तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. हे पीक तयार झाल्यानंतर काढण्यासाठी मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो. यावर्षी सोयाबीन काढण्याचे भावही एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातील मजुरांना तालुक्यात आणले आहे. काहीजणांचे साेयाबीन काढायचे आहे, परंतु सतत सुरु असलेल्या पावसाने मजूर काहीही करु शकत नाहीत. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खराब झाले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
साेयाबीनच्या शेंगांना फुटले काेंब
सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील शेतामध्ये साेयाबीनच्या शेंगांना काेंब फुटल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या साेयाबीनचा उतारा कमी येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. कृषी विभागाने पाहणी करुन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.