यासंदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर, आनंद एबंडवार, कृषी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी १७ मे रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यात नमूद केले आहे की, खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालाचे भाव वाढल्याचे कारण सांगून इफ्को कोरोमंडल, आरसीएफसह सर्वच कंपन्यांनी खतांच्या किमतीत जबर वाढ केली आहे.
आधी १२०० रुपयांना मिळणारी डीएपी खताची गोणी आता १९०० रुपयांना घ्यावी लागणार आहे, तर १०:२६:२६ खताचा दर ११७५ वरून १७७५ झाला आहे. तसेच २०:२०:०:१३ चा दर ९७५ वरून १३५० व १२:३२:१६ चा दर ११८५ वरून १८०० झाला आहे. त्यामुळे आता एवढे महागडे खत कसे विकत घ्यावे व पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तथापि, खतांची दरवाढ तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.