वाशिम : विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री १५ ऑक्टोबरनंतर शांत झाली असून, कार्यकर्ते मताधिक्याचे आडाखे बांधण्यात मग्न आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेमोडीतून मिळणार्या दिलाशामुळेच प्रमुख उमेदवारांमध्ये विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या निकराच्या झुंजींमुळे निकालाचे अंदाज वर्तविणे कठीण होऊन बसले आहे. निकालाबाबत सट्टाबाजारही गोंधळलेला आहे.गत १५ ऑक्टोबरला जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड मतदारसंघात विधानसभेची निवडणूक पार पडली. शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीमधील घटस्फोट, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीत झालेली बिघाडी, भारिप-बहुजन महासंघाने राबविलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाने पकडलेला वेग आदींमुळे तिन्ही मतदारसंघात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. परिणामी, निकालांचे आडाखे बांधण्यात मतदार, कार्यकर्ते, तथा राजकीय जाणकारांसह सट्टेबाजारही गोंधळात असल्याचेच दिसून येत आहे. कांरजा मतदारसंघातील बिगफाईटकडे सट्टाबाजाराचे विशेष लक्ष आहे. येथे भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार युसूफ पुंजाणी, भाजपचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादीचे सुभाष ठाकरे तथा अपक्ष प्रकाश डहाके यांच्यात लढत झाली. मात्र निवडणूकीनंतर येथील निकालाबाबत सट्टाबाजाराने दररोज नवीन अंदाज व र्तविले आहेत. सट्टाबाजारात कधी एक तर कधी दुसर्याच्या भावात चढअतार होत आहे.
सट्टाबाजाराचा गोंधळात ‘गोंधळ’!
By admin | Updated: October 18, 2014 01:14 IST