रतनवाडी येथील जुन्या विहिरीवर नवीन बांधकाम दाखवून व शासकीय निधीची लूटमार करून नागरिक शुद्ध पेयजलापासून वंचित ठेवण्याचा प्रकार रतनवाडी येथे घडला असल्याची चर्चा जाेर धरत आहे. रतनवाडी ग्रा.पं. आवारामध्ये असलेल्या जुन्या विहिरीची थातूरमातूर डागडुजी करून नवीन विहीर बांधल्याचे व नागरिकांच्या घरापर्यंतच्या पाईपलाईनचे बोगस काम करून शासकीय योजनेच्या फडशा बांधकाम कंत्राटदाराने प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून पाडल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. सदरील विहिरीमध्ये अतिशय घाण पाणी साचलेले असून मानव व पशू आरोग्यालाही हे पाणी प्यायला अपायकारक असल्याचे पाहताक्षणी निदर्शनास येते. रतनवाडी येथील नागरिकांना या विहिरीच्या पाण्याचा अजिबात उपयोग नसून नागरिकांनी शंभर रुपये प्रति महिन्याने दुसरीकडून जीवन जगण्यासाठी पाण्याची सोय केलेली असल्याची भीषण वास्तविकता दिसून येत आहे.
आदिवासीबहुल गावात पाणीपुरवठा योजना राबवूनही नागरिक पाण्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:51 IST