प्रामुख्याने शासकीय कार्यालयांमध्ये काम अडल्यानंतर तसेच शासकीय कंत्राटदार व इतरांची देयके अदा करण्यासाठी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जाते. अशा लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी वाशिममध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. गेल्या १३ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट ठाण मांडून असल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाजही तुलनेने कमी प्रमाणात सुरू आहे. यामुळे अनेकांची महत्त्वाची कामे अडलेली आहेत. ही कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या चार जणांवर २०२१ या वर्षात वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे.
....................
कोणत्या वर्षात किती कारवाया
२०१८ - १४
२०१९ -१९
२०२० - १८
२०२१ - ०४
....................
कोरोनाकाळात ‘महसूल’ची वरकमाई जोरात
विभाग। कारवाया
महसूल। ०९
पोलीस। १०
भूमिअभिलेख। ०१
ऊर्जा विभाग । ०३
शिक्षण विभाग। ०३
ग्रामविकास। ०१
कृषी विभाग। ०२
न.प., न.पं. । ०२
सहकार। ०१
इतर लोकसेवक ०३
............................
सर्वात जास्त कारवाया वाशिम तालुक्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२० आणि २०२१ या दोन वर्षात सर्वाधिक कारवाया वाशिम तालुक्यात केल्याची माहिती समोर आली आहे. उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये आठपेक्षा अधिक लाचखोरांना अटक करण्यात आली असून, त्याखालोखाल रिसोड, कारंजा तालुक्यातील लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या भीषण संकटात असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येत आहे.
...........
कोट :
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जो-तो हैराण आहे; मात्र अशाही बिकट परिस्थितीत काही शासकीय अधिकारी व कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारींवरून लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने तातडीची पावले उचलून लाचखोरांना जेरबंद केले आहे.
- एस. व्ही. शेळके
उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम