कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बॅंका मेहरबान
वाशिम : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार असंख्य शेतकरी कर्जमुक्त झाले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, २०२१-२१ या आर्थिक वर्षात दरवर्षीच्या तुलनेत दुपटीने ८०० कोटींचे पीक कर्ज वाटप झाले आहे.
जिल्ह्यात
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ करण्यात आले. जिल्ह्यातील १.६४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. कर्ज माफ होण्यासोबतच संबंधित सर्व शेतकरी पुन्हा पीक कर्ज मिळण्यास पात्रदेखील ठरले. प्रशासनाचे प्रयत्न आणि बँकांनी केलेल्या सहकार्यामुळे एरव्ही ४०० कोटींच्या आत राहणारा पीक कर्ज वाटपाचा आकडा यामुळे ८०० कोटींवर पोहोचला.
.........
कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्षात लाभ झाला. यामुळे थकीत असलेले पीक कर्ज माफ होऊन पुन्हा नव्याने कर्ज मिळू शकले. बँकांनीही अपेक्षित सहकार्य केले.
- राजेश कडू
खानापूर, ता. कारंजा
.........
माझ्याकडे असलेले पीक कर्ज महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत माफ झाल्याने मोठा दिलासा मिळाला. अडचणीच्या काळात पुन्हा पीक कर्ज मिळाले.
- प्रदीप इढोळे
मोतसावंगा, ता. मंगरूळपीर
...........
आर्थिक वर्ष २०२०-२१ - उद्दिष्ट (कोटींत) - १६५०, प्रत्यक्ष वाटप - ८१८, शेतकरी संख्या - १०९४३३
आर्थिक वर्ष २०१९-२० - उद्दिष्ट (कोटींत) - १५७०, प्रत्यक्ष वाटप - ४०४, शेतकरी संख्या - ४७८०२
आर्थिक वर्ष २०१८-१९ - उद्दिष्ट (कोटींत) - १५००, प्रत्यक्ष वाटप - ३९३, शेतकरी संख्या - ५५४२२
आर्थिक वर्ष २०१७-१८ - उद्दिष्ट (कोटींत) - १२०४, प्रत्यक्ष वाटप - ३१२, शेतकरी संख्या - ३७२९९
..............
कोट :
जिल्ह्यात दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे मात्र २०२०-२१ या वर्षात एकूण उद्दिष्टाच्या ५० टक्के, ८१८ कोटींचे पीक कर्ज वाटप करता येणे शक्य झाले. शेतकरी कर्जमुक्त होण्यासोबतच त्यांना पुन्हा नव्याने कर्ज मिळू शकले.
- दत्तात्रय निनावकर
अग्रणी बँक व्यवस्थापक, वाशिम