वाशिम : वाशिम - मालेगाव मार्गावरील अमानी गावातील बहुतांश महिलांनी बिब्यातून गोडंबी काढण्याच्या व्यवसायाची कास धरली असून, ४३ महिलांना महिन्याकाठी १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे आशादायी चित्र आहे. याकामी ‘माविम’ अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य लाभत आहे.
ग्रामीण भागातील असंघटित महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना उद्योग-व्यवसायाची दिशा दाखवून स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करीत आहे. अमानी या गावाची लोकसंख्या जवळपास चार हजारांच्या आसपास असून, अनेक वर्षांपूर्वी गावाच्या परिसरात असलेल्या जंगलातून ग्रामस्थ बिबे गोळा करून त्यामधून गोडंबी काढण्याचे काम करतात. आता व्यापारी मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातून बिबे खरेदी करून अमानी गावातील महिलांना बिब्याची विक्री करतात. बिब्यातून महिलांनी काढलेली गोडंबी खरेदी करण्याचा हा व्यवसाय या गावात अनेक वर्षांपासून आजही निरंतरपणे सुरू आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मालेगाव-२ या लोकसंचालित साधन केंद्राने अमानी गावात सहयोगिनीच्या माध्यमातून १५ महिला स्वयंसहायता बचतगटांची स्थापना केली. या गटांशी १५२ महिला जुळल्या आहे. जवळपास १३ बचतगटातील महिला बिबे फोडण्याचा व्यवसाय करतात. या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी माविमने त्यांना फिरता निधीदेखील दिला. घेतलेला पैसा महिलांनी वेळीच परत केला. महिलांनी घेतलेला पैसा आपल्या उपयोगात आणून तो बचतगटात वेळीच परत केल्याने माविमने त्या महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी ४३ महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. या पैशातून महिलांनी व्यापाऱ्यांकडून बिबे खरेदी केले करून गोडंबी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. महिन्याकाठी जवळपास १५ हजार रुपयाचे उत्पन्न हाती येत असल्याने या ४३ महिलांनी कर्ज स्वरूपात घेतलेले दहा हजार रुपयेदेखील वेळेत परतफेड केले.
.....................
४ क्विटंल बिब्यातून सरासरी ४५ किलो गोडंबी
गावातच व्यापाऱ्यांकडून १६५० रुपये प्रति क्विटंल या दराने चार क्विटंल बिबे खरेदी केले जाते. एक क्विटंल बिब्यामधून १२ किलो गोडंबी काढली. प्रति किलो ५०० रुपये असा दर गोडंबीला मिळतो. महिन्याकाठी ४ क्विटंल बिब्यातून सरासरी ४५ किलो गोडंबी काढली जाते. यामधून बिबे खरेदीचा खर्च वजा जाता महिन्याला गोडंबी विक्रीतून १५ हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे वनिता अंभोरे यांनी सांगितले.