वाशिम :राज्यात २0१४-१५ मध्ये महात्मा फुले जल व भूमीसंधारण अभियानांतर्गत जल व भूमीसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.या निधीतून राज्यातील ३५३ तालुक्यांना जलसंधारण कामांसाठी प्रत्येकी ६.९४ लाख रुपये याप्रमाणे एकुण २४ कोटी ४९ लाख ९२ हजार रुपये तर अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी ५0 लाख १८ हजार रुपये असा खर्च करण्यात येणार आहे. २0१४-१५ मध्ये अभियान राबविण्यास राज्यशासनाने मान्यता दिली असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्राप्त निधीतून २५ कोटी रुपयांचा निधी अनुदानादाखल या अभियानासाठी देण्यास २३ मे रोजी राज्यशासनाच्या जलसंधारण विभागाने मंजुरी दिली आहे. जलसंधारण विभाग,लघुसिंचन विभाग व जिल्हापरिषदेच्या विविध योजनेंतर्गत सिमेंटनाला बांध व मातीनाला बांधांची दुरुस्ती , पाझर तलाव, गाव तलाव आणि पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची दुरुस्ती व बळकटीकरण करणे आदी बाबींवर या मंजूर निधीतून खर्च करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना प्राधीकृत करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, पाझर तलाव, गाव तलाव आणि पिण्याच्या पाण्याच्या दुरूस्ती अपेक्षित असलेल्या किमान ७ जलस्त्रोतांमधील गाळ प्रथम लोकसहभागातून काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्या जलस्त्रोतांची या अभियानातून दुरूस्ती केली जाणार आहे.
जल व भूमीसंधारणासाठी २५ कोटींचा निधी मंजूर
By admin | Updated: May 25, 2014 00:09 IST