जव्हार: जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु. ग्रामपंचायत हद्दीतील चार पाड्यांत पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी टँकरची मागणी पंचायत समितीकडे करूनही टँकर मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आमचे सरकार असूनही आम्हाला पिण्यासाठी पाणी नसल्याची खंत माजी सरपंच जीवा भोगाडे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.१५ कि. मी. वर असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीतील काष्टीपाडा, मोगरवाडी, मोरिगळा, शिवाकोरड्याचीमेट, या पाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून नदी, नाले, विहिरींवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने येथील ग्रामस्थांनी २९ मार्च रोजी टँकर मागणीचा ठराव करून तो पंचायत समितीकडे पाठविला होता. त्याला आता महिना उलटायला तरी या चार पाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करण्यात आला नाही. येथील अधिका-यांकडून तहसिलदारांचा पाहणी अहवाल आणा नंतरच पाणी मिळेल असे सांगितले जाते. जव्हार तहसीलदार येथील अधिकारी पाहणी करण्यासाठी महिना लावत असतील ग्रामस्थांनी करायचे काय? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)
न्याहाळेच्या ४ पाड्यांत पाणीटंचाई
By admin | Updated: April 24, 2017 23:46 IST