- शशी करपे, वसईवर्सोवा जुन्या पूलाच्या दुरुस्तीचे काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवरड्यात सुरुहोणारे काम पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यानंतर चाचण्या होऊन तो सुरू होई पर्यंत मुंबई-अहमदाबाद हायवेवर किमान साडेतीन महिने वाहतूक कोंडीचा जाच सहन करावा लागणार आहे. हा पूल १९७० च्या आसपास बांधण्यात आला आहे. तो १९७३ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. त्याच्या एका गर्डरला डिसेंबर २०१३ मध्ये तडे गेल्यानंतर दुरुस्तीसाठी तो चार महिने बंद ठेवण्यात आला होता. जुना गर्डर बदलून नवा गर्डर लावण्यासाठी चार महिने लागले होते. आता पूलाच्या आणखी एका गर्डरला तडा गेल्याने सप्टेंबवरपासून हा पूल अवजडवाहनांच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. मात्र, गेल्या पाच महिन्यात अनेक तांत्रिक अडचणींमुळे पूलाच्या दुरुस्तीचे काम सुुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन अवघ्या तासाभराच्या प्रवासाठी चार ते पाच तास घालवावे लागत आहेत. याप्रकरणी वसईचे ब्रायन नरोन्हा यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीला प्रोजेक्ट डायरेक्टर शशी भूषण यांनी १ जानेवारी २०१७ रोजी उत्तर दिले आहे. त्यात जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु केले जाणार आहे. ते पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे वर्सोवा जुन्या पूलावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान साडेतीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याआधी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बोलावलेल्या बैठकीत आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम कधी सुरु होणार आणि कधी संपणार याबाबतीत कोणतीही ठोस माहिती दिली नव्हती. राम्बोल इंडिया लिमिटेड या सल्लागार कंपनीने दुरुस्तीसंदर्भात आपला अहवाल चार पाच दिवसांपूर्वीच आयआयटीला दिला असून अद्याप तीने त्यावरील आपला अभिप्राय दिलेला नाही. तो मिळताच दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही सुरु होईल. मात्र हा पूल वाहतुकीस सुरु होण्यासाठी आणखीही कालावधी लागू शकतो अशी माहिती आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली होती. त्यामुळे वर्सोवा पूलाच्या दुरुस्तीबाबत ठोस माहिती उपलब्ध होत नव्हती.आता प्रोजेक्ट डायरेक्टर शशी भूषण यांनी दिलेल्या माहितीवरून वर्सोवा पूलाच्या दुरुस्तीच्या कामाला किमान साडेतीन महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या जुन्या पूलावरील अवजडवाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने वीस-वीस मिनिटे वाहतूक बंद ठेवली जात आहे. त्यामुळे प्रचंडवाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका हजारो वसईकरांना बसू लागला आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेचे पत्रकच कोलमडले आहे. त्याचा सर्वाधिक त्रास चाकरमान्यांना होतो आहे.अन्य पर्याय नाही नवा पूल होईल चार वर्षांतवसई, पालघर,डहाणू आणि गुजरातहून मुंबई, ठाणे त्यानंतर पुढे पुणे, कोल्हापूर, कोकण, गोव्याला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी असल्याने मुंबई, ठाण्याला जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्याचबरोबर पालघर, डहाणू परिसरातील हजारो लोक दररोज कामानिमित्ताने मुंबई, ठाण्याकडे ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. तसेच गुजरातहून मुंबईकडे दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. या सगळ्यांना कोणताच पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने दररोज लाखो लोकांना वाहतूक कोंडीचा जाच सहन करावा लागत आहे. दरम्यान, वसई खाडीवर नवा पाच पदरी पूल बांधण्याची प्रक्रिया सुुरु करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुुरु झाली आहे. त्याचबरोबर भूसंपादनासह सीआरझेड, ईएसआर आणि वनखात्याच्या परवानगी घेण्याचे काम मार्गी लावण्यात येत असल्याची माहितीही भूषण यांनी दिली आहे. मात्र, हा नवा पूल तयार होण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.
वर्सोवा पूल साडेतीन महिने बंद
By admin | Updated: February 3, 2017 02:16 IST