नायगव : पर्यटकांचे आकर्षण असलेले तुंगारेश्वर ओसंडून वाहू लागल्याने रविवारी मोठ्या गर्दीत या ठिकाणी पर्यटकांनी हजेरी लावली होती. पावसाचा जोरही २ दिवसांपासून कमी झाल्याने मुंबईसह विविध भागातील पर्यटक येथील प्रसिद्ध धबधब्याखाली जमा झाले होते. यामुळे हायवे ते मुख्य प्रवेशद्वार येथे वाहतुकीची कोंडी झाली. विविध वनौषधी, वन्यप्राणी, पक्षी यांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते.एकदिवसीय पिकनिकसाठी तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा हा उत्तम पर्याय आहे. मुंबई महामार्गापासून अगदी जवळच असल्याने पर्यटकांची पसंती या भागाला असते. यंदा जूनमध्ये पावसाने गैरहजेरी लावल्याने येथील धबधबे उपलब्ध नव्हते. परंतु जुलैमध्ये उशिराने दाखल झालेल्या पावसाने मात्र पर्यटकांची ही हौस पूर्ण केली. रविवारपासून या भागात मोठी गर्दी होत आहे. येत्या काही महिन्यात लाखो पर्यटक येथे दाखल होणार आहेत. सध्यातरी धबधब्यांचे आकर्षण असलेल्या तरूणाईची पावले येथील नदी, नाले ओलांडून सफारीचा आनंद घेत आहेत.
पर्यटकांनी तुंगारेश्वर झाले हाऊसफुल्ल!
By admin | Updated: July 21, 2014 00:48 IST