विरार : आपल्या पुतणीचा विनयभंग करणाऱ्या सरपंच अनिल ठाकूर याच्यापासून गावातील मुली आणि स्त्रियांना धोका असल्यामुळे सरपंचाची हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव सत्पाळा ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.सरपंच अनिल ठाकूरने होळीच्या दिवशी आपल्या पुतणीला नोकरीचे आमिष दाखवून एका हॉटेलवजा लॉजमध्ये नेले होते. तिथे गुंगीचे औषध देऊन त्याने तिचा विनयभंग केला. मात्र, वेळीच सावध होऊन आपला बचाव केल्यामुळे सदर तरुणीवरील अनर्थ टळला. या प्रकाराची माहिती तिने आपल्या पालकांना सांगितल्यावर अर्नाळा सागरी पोेलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तिथून ही केस काशिमीरा पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर अनिल ठाकूरला अटक करण्यात येऊन त्याची जामिनावर त्याची मुक्तता करण्यात आली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी ग्रामपंचायतीवर धरणे धरून अनिल ठाकूरची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडेही तशी लेखी मागणी करण्यात आली होती. तरीही, त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याचे पडसाद आजच्या महिला ग्रामसभेत उमटले. महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत ग्रामसेवक के.एच. नाईक यांनी माहिती दिली.त्यावर, या योजना तर ठीक आहेत. मात्र, सरपंचच आमच्या अब्रूवर उठला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित महिलांनी या वेळी केला. पुतणीचा विनयभंग करून अनिल ठाकूर निर्ल्लजपणे ग्रामपंचायतीत येऊन बसतो. त्यामुळे दाखले घेण्यासाठी पंचायतीत यायला आम्हाला भीती वाटते. असे या सभेत महिलांनी नमूद केले. त्यानंतर, अनिल ठाकूरची हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव या वेळी एकमताने करण्यात आला. (प्रतिनिधी)
ठाकूर हटाव, बहू-बेटी की इज्जत बचाव
By admin | Updated: April 23, 2016 01:46 IST