ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - जवखेड हत्याकांड प्रकरणाला २० हून अधिक दिवस झाले तरीही गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत. जातीय हत्याकांडाचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवार (दि. १३ ) रोजी मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एक दिवस उपोषण करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या उपोषणाबद्दल डॉ. निरज हातेकर यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शहरी भागातील लोक अशा गंभीर घटनांबद्दल अनभिज्ञ असतात. मुंबई सारख्या शहरातील किमान एक टक्का लोकांनी जरी या घटनेचा निषेध केला तरी याबाबात जागरुकता झाली असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे, जर्मन विभागाच्या प्रा. डॉ. विभा सुराणा यांनी असं म्हटलं की, आज अनेक विद्यार्थ्यांना अशा घटांचे गांभीर्य लक्षात येत नाही. 'Class room should not be a glass room' असं म्हणत त्यांनी वास्तवाची जाण करुन देणं म्हणजेच खरं शिक्षण आहे, म्हणूनच त्या आपल्या विद्यार्थ्यांसह या उपोषणात सहभागी झाल्या.
डॉ. राजन पडवळ यांनी असे सांगितले की, आज मागासवर्गातील अनेक लोक प्रगती करत आहेत. त्यांची प्रगती बघून काही जातीवादी लोकांना पोटशुळ होतो त्यामुळे अशा घटना घडतात. या आंदोलनात मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांच्यासह महारुद्र शिरसाट, किरण सावंत, डॉ. सविता कुलकर्णी, अमेय जाधव, मिहीर कुलकर्णी, श्रेया पटवर्धन आणि उर्मी रानडे यांचा सहभाग होता.