- राहुल वाडेकर, विक्रमगड
राज्यातील १३७ पैकी १०९ नगरपंचायती अस्तित्वात आल्या असून उर्वरीत सर्व नगरपंचायती एप्रिल अखेरीस अस्तित्वात येतील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ़ रणजित पाटील यांनी विधानसभेत केल्याने विक्रमगड नगरपंचायत स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे झाल्यास पालघर जिल्हयातील बोईसर, सरावली, तलासरी, वाडा, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे़ अस्तित्वात येणार असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या पदांच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता देण्यांत येईल अशीही ग्वाही त्यांनी दिली. नव्याने निर्माण झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १८५ मुख्याधिकारीपदांसाठी परीक्षा घेण्यात आली़ त्याचा निकाल नुकताच लागला असून येत्या दोन ते तीन महिन्यांत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल़ या नवनिर्मित नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यांत येत असून पदानिर्मितीस मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता मिळेल असेही सांगण्यात आले आहे़ दरम्यानच्या काळात या नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १८६ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ तालुका मुख्यालय आणि तेथे ग्रामपंचायत असल्यास याठिकाणी लोकसंख्येचा निकष न लावता अशा ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ २५ हजारावर लोकसंख्या असल्यास त्या ठिकाणी नगरपरिषद तयार करण्यांत येते़ अशा ठिकाणी मुख्याधिकारी नियुक्ती करतांना अव्वल, कारकुन, लेखाधिकारी यांचा अनुभव लक्षात घेवुन त्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे.निवडणूकीवर प्रश्नचिन्ह :-ग्रामपंचायतीची निवडणूक १६ एप्रिलला होणार आणि नगरपंचायत एप्रिलच्या अखेरीस अस्तित्वात येणार यामुळे आता निवडणूकीचे करायचे काय? हा प्रश्न कायम आहे. बहिष्कार कायम राहिला तर नगरपंचायतीच्याच निवडणूका होतीलबहिष्कार लागला सार्थकीविक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांकडे प्रस्तावित असतांनाही नगरपंचायतीची घोषणा न झाल्याने व १७ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रापंच्या निवडणुकींवर येथील जनतेने बहिष्कार टाकला होता. त्यानुषंगाने हा विषय विधानसभेमध्ये गेल्याने त्यावर तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे़ त्यामध्ये प्रस्तावित नगरपंचायती एप्रिल अखेरपर्यत अस्तित्वात येण्याची शक्यता असल्यामुळे विक्रमगड येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याचा निर्णय सार्थकी लागला आहे़